संघर्षातून संशोधनात सुवर्णभरारी; डॉ. शिल्पा शांताराम पवार यांना पीएच.डी.
काशिनाथ शिंदे : पुणे
जिद्द, चिकाटी आणि शिक्षणावरील निष्ठेच्या बळावर पुण्यातील डॉ. शिल्पा शांताराम पवार यांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथून ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशामुळे शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. पवार यांचे बालपण अत्यंत साध्या आणि संघर्षमय परिस्थितीत गेले. वडील स्वर्गीय प्रा. शांताराम पवार हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA), पुणे येथे भूगोल विषयाचे प्राध्यापक होते, तर आई श्रीमती चंद्रभागा पवार यांनी शिक्षिका म्हणून कार्य करत मुलांच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. ग्रामीण भागातील विविध शाळांमध्ये शिक्षण घेत अनेक अडचणींवर मात करत त्यांनी उच्च शिक्षणाचा प्रवास यशस्वी केला.
एम.ए., एलएल.बी. आणि एम.लिब. अँड इन्फॉर्मेशन सायन्स या पदव्या पूर्ण केल्यानंतर त्यांनी यूजीसी-नेट परीक्षा उत्तीर्ण केली. तसेच पाली व बौद्ध अध्ययनातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बीसीयूडी अंतर्गत लघु संशोधन प्रकल्पही यशस्वीरीत्या पूर्ण केला.
त्यांच्या पीएच.डी. संशोधनाचा विषय “महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये पाली व बौद्ध अध्ययन विषयातील पीएच.डी. प्रबंधांच्या संदर्भग्रंथसूचीचे शास्त्रीय विश्लेषण” हा असून भविष्यातील संशोधक, अभ्यासक आणि ग्रंथालय व माहितीशास्त्र क्षेत्रासाठी हे संशोधन उपयुक्त ठरणार आहे. या संशोधनासाठी त्यांना संशोधन मार्गदर्शक डॉ. दिगंबर खोबरागडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
डॉ. पवार यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांनी दिलेल्या शिक्षणसंस्कारांना, कुटुंबीयांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याला, संशोधन मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाला तसेच कन्या प्रत्यंजाच्या प्रेरणादायी सहवासाला दिले. त्यांनी २०२२ ते २०२६ या चार वर्षांच्या संशोधन प्रवासात कुटुंबाच्या सहकार्यामुळेच हे यश शक्य झाल्याचे सांगितले.
सध्या डॉ. शिल्पा पवार या इंदिरा विद्यापीठ, ताथवडे (पुणे) येथे ग्रंथपाल म्हणून कार्यरत असून अध्यापन, संशोधन, लेखन आणि विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. “ज्ञानाचा शोध कधीच संपत नाही. सातत्यपूर्ण अध्ययन, चिकित्सक दृष्टिकोन आणि समाजोपयोगी संशोधन हीच प्रत्येक संशोधकाची खरी जबाबदारी आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
