Oplus_131072
काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड
पिंपरी : मोशी कचरा डेपो दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीस महापालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत असून पालिका आयुक्त आणि कचरा डेपोचे प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णी यांना तातडीने बडतर्फ करून त्यांच्यावर संदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उद्धवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मृत्यू झाले असताना या विषयावर पंचतारांकित हाॅटेलमध्ये बैठक घेतली जाते यावरुन मुख्यमंत्र्यांची गोरगरिबांविषयीची असंवेदनशिलता दिसून येते, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
चिंचवड येथे रविवारी (दि. १२) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी महापालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. अंधारे म्हणाल्या, दुर्घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींसह मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या प्रकरणात अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. कचरा डेपो परिसरातील संबंधित इमारतीला केवळ तळमजल्याची परवानगी असताना वरचे दोन मजले अनधिकृतपणे उभारण्यात आले. मात्र, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी कोणताही आक्षेप घेतला नाही, असा आरोप त्यांनी केला.
मृतांच्या कुटुंबीयांना केवळ पाच किंवा दहा लाखांची मदत देऊन शासनाची जबाबदारी संपत नाही. प्रत्येक बाधित कुटुंबातील एका सदस्याला महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी द्यावी. या प्रकरणी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असून, गरज पडल्यास रस्त्यावरची लढाई लढू, न्यायालयातही दाद मागू, असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्घटनास्थळी न येणे ही असंवेदनशीलता असल्याची टीकाही त्यांनी केली.
थयथयाट करायला मी नवनीत राणा नाही
मोशी कचरा डेपो दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतरही सत्ताधाऱ्यांच्या शांततेवर उद्धवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपरोधिक टीका केली. मी नवनीत राणा नाही; जाती-धर्माच्या राजकारणासाठी थयथयाट करणाऱ्यांपैकी नाही, असे म्हणत त्यांनी खासदार नवनीत राणा यांचे नाव घेत चिमटा काढला. इतरवेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणारे नेते या दुर्घटनेवर मात्र गप्प का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
———
महेश लांडगेंचे हिंदुत्व हंगामी
सुषमा अंधारे यांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यावर थेट निशाणा साधला. हिंदुत्वाचा गजर करणाऱ्यांनी आठ गरीबांचे जीव गेल्यानंतर महापालिका आयुक्तांना जाब का विचारला नाही? गरिबांच्या मृत्यूवेळी त्यांचे हिंदुत्व कुठे गेले? असा सवाल करत त्यांनी लांडगे यांचे हिंदुत्व हंगामी असल्याचा टोला
अजितदादा दोन तासांत आले असते
अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेवर साधे भाष्यही केले नाही, अशी खंत व्यक्त करत त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आठवण काढली. अशी दुर्घटना घडली असती तर अजितदादा दोन तासांत घटनास्थळी पोहोचले असते. त्यांनी कधी जात, धर्म किंवा राजकारण पाहिले नाही. त्यामुळे त्यांच्या संवेदनशीलतेची बरोबरी सध्याचे सत्ताधारी करू शकत नाहीत, असा टोला अंधारे यांनी लगावला.
———-
अधिवेशनात मख्यमंत्र्यांचे भाष्यही नाही
गोरगरिबांचे जीव गेले, तरी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात साधे भाष्यही केले नाही. पुण्यात येऊन दुर्घटनास्थळी न जाता पंचतारांकित हॉटेलात बैठक घेतली. यातून गोरगरिबांविषयी त्यांची असंवेदनशीलता स्पष्ट होते, असा आरोप त्यांनी केला. प्रशासनाला जाब विचारण्याऐवजी औपचारिक बैठका घेण्यात सरकार धन्यता मानत असल्याचा टोलाही अंधारे यांनी लगावला.
