Oplus_131072
काशिनाथ शिंदे लातूर
लातूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत कॉपर वायर व डीसी केबल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीच्या मालाच्या विक्रीतून मिळालेली २ लाख ५० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, प्राथमिक चौकशीत त्याने लातूर व धाराशिव जिल्ह्यातील तब्बल ९ चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याने अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याच्या सूचना विशेष पथकाला दिल्या होत्या.
त्यानुसार, १२ जुलै रोजी हरंगुळ रेल्वे पुलाजवळ गस्त घालत असताना संशयास्पद हालचाली करणाऱ्या विकास विलास जाधव (वय ४०, रा. आवंतीनगर, पीव्हीआर चौक, लातूर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या पिशवीची झडती घेतली असता २ लाख ५० हजार रुपयांची रोकड आढळून आली.
चौकशीत ही रक्कम चोरी केलेल्या कॉपर वायर व डीसी केबल विक्रीतून मिळाल्याची आरोपीने कबुली दिली. तसेच सागर मच्छिंद्र माने (रा. उमरगा, जि. धाराशिव) आणि नरसिंग दत्तात्रय माने (रा. तगरखेडा, ता. निलंगा, जि. लातूर) यांच्या साथीने ओमनी कार व रिक्षाचा वापर करून औसा, चाकूर आणि लातूर शहरातील इलेक्ट्रिकल दुकाने, गोदामे व इतर ठिकाणांहून कॉपर वायर व डीसी केबल चोरी केल्याची माहितीही समोर आली.
तपासादरम्यान आरोपीने औसा पोलीस ठाण्याचे तीन, चाकूरचे दोन, गांधी चौक पोलीस ठाण्याचा एक तसेच धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, नळदुर्ग आणि शिराढोण पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक अशा एकूण ९ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
जप्त करण्यात आलेली रोकड ही चोरीतील माल विक्रीतून मिळाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच चोरीतील उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
आरोपीला औसा पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ५०६/२०२५ मध्ये मुद्देमालासह ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास औसा पोलीस करीत आहेत.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे यांच्यासह युवराज गिरी, प्रदीप स्वामी, राजेश कंचे, मोहन सुरवसे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, काकासाहेब बोचरे, रामदास बाचीफळे आणि अंजली गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
