मुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीस उपस्थिती
राज्यातील ओबीसी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक तसेच विविध प्रलंबित विषयांवर चर्चा करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात पार पडली. राज्याचे महसूल मंत्री तथा समितीचे अध्यक्ष मा. श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपस्थित राहून ओबीसी समाजाच्या विविध महत्त्वपूर्ण प्रश्नांबाबत चर्चा केली.
या बैठकीत दिनांक १० व १६ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयांवरील कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर इतर मागास आर्थिक विकास महामंडळासाठी विविध योजना राबविणे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर शासकीय वसतीगृहे उभारणे, महाज्योतीच्या प्रादेशिक कार्यालयांसाठी जागा उपलब्ध करून देणे तसेच आवश्यक निधी व पदमान्यता देण्याबाबत चर्चा करण्यात आली. विभागीय स्तरावरील कार्यालयांच्या बांधकामासाठी दरवर्षी किमान ५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचा मुद्दाही बैठकीत मांडण्यात आला.
याशिवाय ओबीसी शासकीय वसतीगृहे व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेतील लाभार्थी विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या वाढविणे, महाज्योती व इतर मागास आर्थिक विकास महामंडळातील योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संचालक मंडळांच्या नियुक्त्या करणे, तसेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी प्रशिक्षणासाठी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे शासकीय जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली.
महाज्योतीसाठी पुणे येथे सारथीच्या धर्तीवर प्रादेशिक कार्यालय, स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण केंद्र, अद्ययावत ग्रंथालय व निवासी वसतीगृह उभारण्यासाठी शिवाजीनगर येथील दुग्ध व्यवसाय विभागाची उपलब्ध जागा हस्तांतरित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच नाशिक येथील मेरी परिसरातील सर्वे क्रमांक ११७ या जागेवर महाज्योतीच्या प्रादेशिक कार्यालयाचे बांधकाम सुरू करण्यासंदर्भातही सकारात्मक चर्चा झाली.
राज्यात २७ टक्के आरक्षण असूनही सरकारी सेवेत ओबीसींचे प्रमाण केवळ ९.५० टक्के असल्याबाबत अद्ययावत माहिती घेण्याबाबत निर्देश देण्यात आले. तसेच महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त महाज्योतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबतही चर्चा करण्यात आली.
या बैठकीस मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य वनमंत्री श्री. गणेश नाईक, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री. अतुल सावे, पाणीपुरवठा मंत्री श्री गुलाबराव पाटील,मृद व जलसंधारण मंत्री श्री. संजय राठोड यांच्यासह शासनाच्या विविध विभागांचे सचिव यांची प्रमुख उपस्थिती होती
