काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड, दि. १५ जून २०२६ : तळेगाव टोलनाक्यावर टोल कर्मचाऱ्यांच्या कथित उद्धट वर्तनामुळे आणि निष्काळजीपणामुळे एका पत्रकाराच्या कुटुंबाचा मोठा अपघात थोडक्यात टळल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी शिवशाही शासन पक्षाने केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पत्रकार आपल्या कुटुंबासह वाहनाने प्रवास करत असताना टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांकडून कथितरित्या अयोग्य वर्तन करण्यात आले. तसेच अचानक बॅरियर उघडणे-बंद करणे आणि वाहन अडविण्याच्या प्रकारामुळे मागून येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला. चालकाने वेळीच वाहनावर नियंत्रण मिळवल्याने संभाव्य दुर्घटना टळली. मात्र या घटनेमुळे कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे सांगण्यात आले.
या घटनेचा निषेध करत शिवशाही शासन पक्षाचे संस्थापक प्रमुख युवराज भगवान दाखले यांनी दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
शिवशाही शासन पक्षाने प्रशासनाकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करणे, २४ तासांच्या आत त्यांना निलंबित करून चौकशी सुरू करणे तसेच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करणे आणि पत्रकार कुटुंबाला योग्य नुकसानभरपाई व लेखी दिलगिरी व्यक्त करणे यांचा समावेश आहे.
दरम्यान, या प्रकरणी २४ तासांत कारवाई न झाल्यास तळेगाव टोलनाक्यावर आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवशाही शासन पक्षाने दिला आहे. पत्रकारांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
