दिघी सेवा केंद्रात उद्घाटन; मोफत वाचनालय व स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचा मानस
काशिनाथ शिंदे : पिंपरी
स्वामी समर्थ सेवा मार्ग हा केवळ आध्यात्मिक नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपणारा मार्ग असून या मार्गातील ८० टक्के कार्य हे समाजहितासाठी समर्पित आहे. पर्यावरण संवर्धन, संस्कार, जनजागृती आणि गरजूंना मदत अशा विविध माध्यमांतून सेवा कार्य राबविले जात असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचे पुणे जिल्हाप्रमुख सतीशदादा मोटे यांनी केले.
दिघी येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्रात सेवेकऱ्यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या ‘मातोश्री शकुंतलाताई प्लेट बँके’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी सहकार तज्ज्ञ अॅड. अजित बोराडे, बाळासाहेब चव्हाण यांच्यासह शेकडो भाविक, सेवेकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मोटे म्हणाले की, स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये १८ विविध विभागांच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य सुरू आहे. प्रश्नोत्तर विभागातून दुःखी व समस्याग्रस्त नागरिकांना मार्गदर्शन केले जाते, तर बालसंस्कार विभागामार्फत ५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये संस्कार व व्यक्तिमत्त्व विकास घडविला जातो. तसेच पर्यावरण-प्रकृती विभागाच्या माध्यमातून स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.
समाजसेवेचा विस्तार करताना सेवा केंद्रामार्फत लवकरच मोफत वाचनालय तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका सुरू करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
यावेळी परिसरातील शेकडो सेवेकरी उपस्थित होते. मातोश्री शकुंतलाताई प्लेट बँकेच्या माध्यमातून सामाजिक कार्यक्रमांसाठी आवश्यक भांडी उपलब्ध करून देत गरजू कुटुंबांना मदत करण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. उपस्थित सेवेकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाजहितासाठी अशाच सेवा कार्यांना अधिक बळ मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
काय आहे मातोश्री शकुंतलाताई प्लेट बँक उपक्रम
मातोश्री शकुंतलाताई प्लेट बँकेत एक ताट, एक चमचा व एक ग्लास अशा ३०० अशी संचांची उपलब्धता करण्यात आली आहे. सामाजिक व धार्मिक स्वरूपाच्या शाकाहारी कार्यक्रमांसाठी हे संच विनामोबदला दिले जाणार आहेत. ताटे घेताना व परत करताना स्वच्छता आणि जपणूक राखावी, अशी अपेक्षा सतीशदादा मोटे यांनी व्यक्त केली. संसाधनांचा पुनर्वापर, खर्चात बचत आणि सामाजिक सहकार्य वाढविणारा हा उपक्रम ठरणार आहे.
