Oplus_131072
काशिनाथ शिंदे पुणे : किराणा दुकाने, सुपरमार्केट, पानटपऱ्या आणि विविध विक्री केंद्रांमध्ये रंगीबेरंगी चिप्स, कुरकुरे आणि पॅकेज्ड स्नॅक्सची आकर्षक मांडणी सर्वत्र दिसून येते. विशेष म्हणजे ही उत्पादने अनेकदा दुकानांच्या प्रवेशद्वारावर किंवा मुलांच्या सहज नजरेस पडतील अशा ठिकाणी ठेवली जात असल्याने बालकांमध्ये त्याबाबत आकर्षण निर्माण होत असल्याची चिंता पालक आणि आरोग्य क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
लहान मुलांना चमकदार पॅकेजिंग, आकर्षक रंगसंगती आणि वेगळ्या आकारांच्या वस्तू सहज भुरळ घालतात. परिणामी बाजारात पालकांसोबत गेलेली मुले अशा पदार्थांसाठी हट्ट करू लागतात. अनेकदा मुलांचा आग्रह मान्य करत पालकही हे पदार्थ खरेदी करतात. कालांतराने ही सवय वाढत जाऊन जंक फूड मुलांच्या दैनंदिन आहाराचा भाग बनत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रक्रिया केलेल्या अनेक स्नॅक्समध्ये जास्त प्रमाणात मीठ, तेल आणि कृत्रिम घटकांचा वापर असू शकतो. अशा पदार्थांचे वारंवार सेवन झाल्यास मुलांचा कल घरगुती आणि पौष्टिक आहारापासून दूर जाऊ शकतो. त्यामुळे भविष्यात विविध आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो.
सध्या अनेक घरांमध्ये भूक लागल्यानंतर फळे, दूध, पोळी-भाजी यांसारख्या पौष्टिक पदार्थांऐवजी चिप्स किंवा तत्सम खाद्यपदार्थांची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये चवीसोबतच दुकानांमधील आकर्षक प्रदर्शनाचाही मोठा वाटा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
व्यापाऱ्यांच्या व्यवसायस्वातंत्र्यावर कोणताही प्रश्न उपस्थित करण्याचा हेतू नसला तरी मुलांच्या हिताच्या दृष्टीने अशा उत्पादनांच्या मांडणीबाबत मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यकता आहे का, यावर सार्वजनिक स्तरावर चर्चा होणे गरजेचे असल्याचे मत पुढे येत आहे.
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करणे, पालक, पोषणतज्ज्ञ, व्यापारी संघटना आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा करणे, अशा उपाययोजनांचा विचार होऊ शकतो.
दुकानांच्या प्रवेशद्वारावर किंवा मुलांच्या नजरेसमोर जंक फूडची मांडणी टाळणे, त्याऐवजी पौष्टिक पर्यायांना प्राधान्य देणे तसेच शाळा, पालक आणि समाजाच्या माध्यमातून आरोग्यदायी आहाराबाबत जनजागृती वाढवणे, या उपाययोजना प्रभावी ठरू शकतात, असे जाणकारांचे मत आहे.
कुपोषणाबरोबरच चुकीच्या आहाराच्या सवयी आणि वाढते आरोग्यविषयक प्रश्न ही आजची गंभीर आव्हाने आहेत. त्यामुळे समस्या उद्भवल्यानंतर उपाय शोधण्यापेक्षा त्यांना सुरुवातीलाच प्रतिबंध घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.
हा विषय केवळ चिप्स किंवा कुरकुरे विक्रीपुरता मर्यादित नसून भविष्यातील पिढीच्या आरोग्याशी निगडित असल्याने सर्व संबंधित घटकांनी एकत्रितपणे विचार करून योग्य धोरणात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा पालक आणि जागरूक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
