Oplus_131072
काशिनाथ शिंदे : माहितीचा अधिकार (RTI) कायद्याच्या नियमावलीतील वादग्रस्त दुरुस्तींविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकारने या दुरुस्त्या मागे न घेतल्यास ५ जुलैपासून उपोषण सुरू करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली. मात्र, या भेटीनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुख्य माहिती आयुक्त हे सरकारचे अधिकृत प्रतिनिधी नसताना त्यांनी अण्णा हजारे यांच्या भावना आणि मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन कोणत्या अधिकारात दिले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकार कायद्याला कमकुवत करणाऱ्या कोणत्याही दुरुस्त्या स्वीकारल्या जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व टिकवून ठेवण्यासाठी जनतेनेही या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
राज्यभरातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये या घडामोडींमुळे मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, सरकार याबाबत कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या घोषणेमुळे RTI नियमांवरील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
