Oplus_131072
काशिनाथ शिंदे पिंपरी : राज्यभर सुरू असलेल्या आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे वाहनधारक, परिवहन व्यावसायिक आणि एजंट यांची मोठी गैरसोय होत असताना, या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाहतूक सेलचे शहराध्यक्ष विनोद वरखडे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आरटीओमधील संपामुळे वाहन नोंदणी, हस्तांतरण, वाहन परवान्यांचे नूतनीकरण, परमिट नूतनीकरण, वाहन कर भरणा तसेच खटला विभागाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. परिणामी, वाहनधारकांना वारंवार आरटीओ कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत होते. अनेक महत्त्वाची कामे रखडल्याने वाहनधारकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर विनोद वरखडे यांनी पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी, परिवहन आयुक्त, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन संपाबाबत तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली होती. आरटीओ कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असतील, तर शासनाने त्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा; मात्र सामान्य वाहनधारकांना वेठीस धरणे योग्य नसल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले होते.
वरखडे यांच्या पाठपुराव्यानंतर वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या. आरटीओ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर अखेर संप मागे घेण्यात आला. त्यामुळे आरटीओ कार्यालयांमधील कामकाज लवकरच पूर्ववत होणार असून, रखडलेली कामे मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संप मागे घेतल्याने सामान्य वाहनधारक, परिवहन व्यावसायिक आणि एजंट यांनी समाधान व्यक्त केले आहे.
