Oplus_131072
काशिनाथ शिंदे :पिंपरी-चिंचवड, २६ जून : सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती शिवशाही शासन पक्ष व हिंदू मातंग सेना यांच्या वतीने चिखली येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करत मातंग समाजाच्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
संस्थापक प्रमुख लोकसेवक युवराज भगवान दाखले यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला मातंग समाजातील नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना युवराज दाखले म्हणाले, “राजर्षी शाहू महाराजांनी १९०२ मध्ये कोल्हापूर संस्थानात ५० टक्के आरक्षण लागू करून बहुजन समाजाला सामाजिक न्याय दिला. शिक्षण आणि नोकरीत वंचित घटकांना संधी उपलब्ध करून दिली. मात्र आजही मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळत नसल्याची खंत आहे. शाहू महाराजांचे ‘प्रत्येक गावात शाळा आणि प्रत्येक हाताला काम’ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
कार्यक्रमात तीन महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. त्यामध्ये अनुसूचित जातींमध्ये अ-ब उपवर्गीकरण तातडीने लागू करून मातंग समाजाला ७ टक्के आरक्षण देण्याची मागणी, पिंपरी-चिंचवडमध्ये राजर्षी शाहू महाराजांचे भव्य स्मारक व ‘शाहू सृष्टी’ उभारण्याची मागणी तसेच २६ जून हा दिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी आरक्षणाच्या आंदोलनात प्राण गमावलेल्या शहीद संजय ताकतोडे, अविनाश खंडागळे आणि इतर आंदोलकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “शाहू महाराजांनी ज्या सामाजिक न्यायासाठी संघर्ष केला, त्याच लढ्यात बलिदान दिलेल्या कार्यकर्त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही संघर्ष सुरूच ठेवू,” असेही युवराज दाखले यांनी सांगितले.
कार्यक्रमास प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, ज्येष्ठ नेते नामदेव अण्णा रिटे, शिवछावा मराठा संघटनेचे संस्थापक प्रमुख सचिन आण्णा लिमकर, कार्यकारी प्रमुख राहुल धस, संजय ढकोलिया, महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा उषामाई कांबळे, पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्षा अनिता वैरागळ यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
