Oplus_131072
काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड
घरकुल चौक परिसरात पावसाच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे नागरिकांचा संताप अनावर झाला. संतप्त नागरिकांनी चारही बाजूंनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.
“घरासमोर पावसाचे पाणी साचलेले आहे, मात्र नळातून पिण्याचे पाणीच येत नाही,” अशी तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली. दरवर्षी पावसाळ्यात घरकुल परिसर जलमय होत असून, वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यात अधिकारी जेसीबीवरून पाहणी करून निघून जातात; मात्र सोसायट्यांमध्ये साचलेले पाणी तसेच राहते. त्यामुळे डासांची उत्पत्ती, दुर्गंधी आणि विविध साथीच्या आजारांचा धोका वाढला असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
“मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा संतप्त सवाल घरकुलवासीयांनी उपस्थित करत तातडीने जलनिस्सारण व्यवस्था सुधारावी, साचलेल्या पाण्याचा निचरा करावा आणि नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करावा, अशी जोरदार मागणी केली.
दरम्यान, आंदोलनामुळे प्रशासनाची धावपळ उडाली असून नागरिकांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
