काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड
रुपीनगर–सहयोगनगर परिसरातील वारंवार होणाऱ्या वीजखंडित समस्येला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी सेक्टर २४ येथील वीज उपकेंद्रातून स्वतंत्र विद्युत वाहिनी मंजूर करून ती तातडीने कार्यान्वित करावी, अशी जोरदार मागणी नगरसेविका तथा प्रभाग अध्यक्षा शिवानी दादासाहेब नरळे यांनी महावितरणकडे केली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
रुपीनगर व सहयोगनगर परिसरात गेल्या काही वर्षांत लोकसंख्या, व्यापारी आस्थापना तसेच लघुउद्योगांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी परिसरातील विजेची मागणी वाढली असून, सध्याच्या विद्युत वाहिनीवर मोठ्या प्रमाणात भार पडत आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार वीजखंडित होणे, तांत्रिक बिघाड, वीजपुरवठा खंडित होणे तसेच कमी-जास्त दाबाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर सेक्टर २४ येथील वीज उपकेंद्रातून रुपीनगर–सहयोगनगर परिसरासाठी स्वतंत्र विद्युत वाहिनी टाकल्यास सध्याच्या वीजवाहिनीवरील भार कमी होऊन परिसरातील वीजपुरवठा अधिक स्थिर आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
नगरसेविका शिवानी दादासाहेब नरळे यांच्या वतीने दादासाहेब नरळे यांनी महावितरणच्या भोसरी विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत निवेदन साद केले. यावेळी परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या वीज समस्यांबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
या चर्चेदरम्यान स्वतंत्र विद्युत वाहिनीच्या कामाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करून प्रत्यक्ष काम सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे रुपीनगर–सहयोगनगर परिसरातील नागरिकांना भविष्यात अधिक स्थिर वीजपुरवठा मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
या कामासाठी आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून, महावितरणचे भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता विश्वनाथ लहाने, प्राधिकरण विभागाचे अभियंता महाजन, अतिरिक्त कार्यकारी अभियंता किरण सरोदे तसेच गणेशनगर विभागाचे कार्यकारी अभियंता बनसोडे यांच्याशी या विषयावर सातत्याने चर्चा करण्यात येत आहे.
रुपीनगर–सहयोगनगर परिसरातील नागरिकांची वीजपुरवठ्याची गंभीर समस्या लक्षात घेता महावितरण प्रशासनाने या कामाला प्राधान्य देऊन तातडीने प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. स्वतंत्र विद्युत वाहिनी कार्यान्वित झाल्यास वारंवार होणाऱ्या वीजखंडित समस्येतून नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा मिळण्याची शक्यता आहे






