विद्यार्थ्यांनी नवकल्पना, कौशल्य आणि सातत्यपूर्ण शिक्षणावर भर द्यावा : दीपक शिंगण
काशिनाथ शिंदे
पिंपरी, पुणे: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. या बदलांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहत विद्यार्थ्यांनी सतत जिज्ञासू राहावे, नवकल्पनांना प्रोत्साहन द्यावे आणि तांत्रिक घडामोडींचा सातत्याने अभ्यास करावा. भारताला जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात नेतृत्व करण्याची मोठी संधी असून, त्यासाठी विद्यार्थ्यांनी नवोन्मेषी दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे, असे क्रिस्टा कंपनीचे वरिष्ठ अभियांत्रिकी संचालक दीपक शिंगण यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठातील स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्सच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दीक्षारंभ’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील बदल, उद्योगाच्या गरजा आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला अक्कॉप्स सिस्टीम्सचे सहसंस्थापक विजेंद्र यादव, स्केल्ड एजिल ट्रान्सफॉर्मेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. महेंद्र रामदासी, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, कुलसचिव डॉ. अनिल महेश्वरी तसेच स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्सचे प्रमुख डॉ. कमलेश मेश्राम आदी उपस्थित होते.
उद्योगाभिमुख शिक्षणावर भर
कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी पीसीईटीच्या ३५ वर्षांहून अधिक काळाच्या शैक्षणिक परंपरेची माहिती दिली. उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, जपानी व कोरियन उद्योगांसोबतचे सहकार्य, जागतिक स्तरावरील संधी आणि कौशल्याधारित शिक्षणाचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःला सक्षम बनवावे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. कमलेश मेश्राम यांनी विद्यार्थ्यांनी हॅकेथॉन, उद्योगमान्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम, मेघ संगणन, माहिती-विज्ञान तसेच नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या ज्ञानात सातत्याने भर घालावी, असे सांगितले. नवकल्पना स्वीकारून उपलब्ध प्रत्येक संधीचा लाभ घेत विद्यार्थ्यांनी यशस्वी कारकीर्द घडवावी, असेही त्यांनी नमूद केले.
‘शिका, पुन्हा शिका आणि गरजेनुसार विसरून नव्याने शिका’
डॉ. महेंद्र रामदासी यांनी व्यावसायिक जीवनातील वेग आणि बदल स्वीकारण्याचे महत्त्व स्पष्ट केले. तांत्रिक कौशल्यांसोबतच सातत्याने शिकणे, पुन्हा शिकणे आणि आवश्यकतेनुसार जुन्या पद्धती सोडून नव्या पद्धती स्वीकारणे ही यशस्वी व्यावसायिकाची खरी ओळख आहे. बदल हा व्यावसायिक जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याने त्यासाठी सदैव तयार राहावे, असे त्यांनी सांगितले.
भविष्यात सायबर सुरक्षेला मोठे महत्त्व
विजेंद्र यादव यांनी सायबर सुरक्षा, डिजिटल पायाभूत सुविधा आणि भारतासाठी स्वदेशी सायबर सुरक्षा उपाय विकसित करण्याच्या गरजेवर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मजबूत संगणक प्रोग्रामिंग कौशल्ये, मूलभूत संकल्पनांवरील प्रभुत्व आणि समस्यांकडे जिज्ञासू वृत्तीने पाहण्याची सवय विकसित करावी, असे त्यांनी सांगितले. भविष्यातील डिजिटल युद्धांमध्ये सायबर सुरक्षा महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचेही यादव यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमादरम्यान शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त व कुलपती हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.






