काशिनाथ शिंदे: मुंबई
मुंबई / पंढरपूर : मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांच्या टप्पा वाढ मागणीसाठी झालेल्या भव्य आंदोलनाची राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. आंदोलनादरम्यान शिक्षकांना देण्यात आलेल्या आश्वासनांची तातडीने पूर्तता व्हावी, यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत त्वरित बैठक घेऊन सकारात्मक निर्णयाच्या दिशेने कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे तसेच लेखी पत्राद्वारे दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी मुंबईतील आझाद मैदानावर राज्यभरातील शिक्षकांनी टप्पा वाढीच्या मागणीसाठी विराट आंदोलन छेडले होते. आंदोलनाच्या समारोपावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाभुसे यांनी आंदोलनकर्त्यांना एका महिन्याच्या आत मंत्रालयात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते.
या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर आज पंढरपूर येथे **’एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना’**च्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे मार्गदर्शक मंगेश चिवटे, प्रदेशाध्यक्ष डॉ. बापूसाहेब अडसूळ आणि प्रदेश सहसचिव उमेश कल्याणी उपस्थित होते.
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. शिक्षकांच्या टप्पा वाढीसह अन्य प्रलंबित प्रश्नांवर तातडीने बैठक घेऊन निर्णय प्रक्रिया सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख तसेच भावी शिक्षक आमदार म्हणून चर्चेत असलेले मंगेश चिवटे यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या तत्पर भूमिकेमुळे मंत्रालयात लवकरच उच्चस्तरीय बैठक होण्याची शक्यता असून, शिक्षकांच्या टप्पा वाढीचा रखडलेला प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा शिक्षकांमधून व्यक्त केली जात आहे.
