Oplus_131072
: काशिनाथ शिंदे मसूर,
कऱ्हाड तालुक्यातील किवळ गावाने पुन्हा एकदा अभिमानाची भरारी घेतली आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील चार होतकरू युवकांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील पोलिस दलांमध्ये निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
राज्यभरातील हजारो उमेदवारांमधील तीव्र स्पर्धेत अक्षय विजय साळुंखे आणि आदित्य संजय साळुंखे यांनी मुंबई शहर पोलिस दलात स्थान मिळवले. तर सुयोग शिवाजी थोरात याने पुणे कारागृह पोलिस दलात यश संपादन केले असून समाधान अर्जुन कोळी याची पिंपरी-चिंचवड पोलिस दलात निवड झाली आहे.
शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यांत उत्कृष्ट कामगिरी करत या चारही युवकांनी आपल्या जिद्दीची आणि मेहनतीची प्रचिती दिली. कठोर परिश्रम, शिस्तबद्ध दिनचर्या, नियमित सराव आणि कुटुंबीयांचे भक्कम पाठबळ यांच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले.
विशेष म्हणजे, किवळ गावात गेल्या चार ते पाच वर्षांपासून दरवर्षी चार ते पाच युवक-युवतींची पोलिस दल, लष्कर तसेच विविध शासकीय सेवांमध्ये निवड होत आहे. त्यामुळे गावात स्पर्धा परीक्षा आणि शासकीय सेवांविषयी प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून अनेक तरुण-तरुणी यशाच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
या चारही युवकांच्या यशामुळे किवळ गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
