काशिनाथ शिंदे : मुंबई
मुंबई / पंढरपूर : राज्यभरातील शिक्षकांनी आझाद मैदानावर उभारलेल्या टप्पा वाढ आंदोलनाचा आवाज अखेर मंत्रालयापर्यंत पोहोचला आहे. आंदोलनातील मागण्यांची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना तात्काळ बैठक घेण्याचे निर्देश दिल्याने शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीला वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
आझाद मैदानावरील आंदोलनावेळी शिक्षकांना दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक घेऊन पुढील कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे तसेच लेखी पत्राद्वारे शिक्षणमंत्री दादा भुसे यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
यापूर्वी मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांच्या टप्पा वाढीसाठी राज्यभरातील शिक्षकांनी मोठे आंदोलन छेडले होते. आंदोलनाच्या समारोपावेळी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी एका महिन्याच्या आत मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही बैठक न झाल्याने शिक्षकांमध्ये नाराजी होती.
दरम्यान, पंढरपूर येथे **’एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना’**च्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी संघटनेचे मार्गदर्शक मंगेश चिवटे, प्रदेशाध्यक्ष डॉ. बापूसाहेब अडसूळ आणि प्रदेश सहसचिव उमेश कल्याणी उपस्थित होते. निवेदन स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून बैठक लवकरात लवकर आयोजित करण्याचे निर्देश दिले.
शिक्षकांच्या टप्पा वाढीच्या प्रश्नासाठी मंगेश चिवटे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतलेल्या तातडीच्या भूमिकेमुळे मंत्रालयात लवकरच उच्चस्तरीय बैठक पार पडण्याची शक्यता असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या टप्पा वाढीच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णयाची अपेक्षा राज्यभरातील शिक्षक व्यक्त करत आहेत.
