काशिनाथ शिंदे : पुणे
ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या इमर्जन्सी विभागात रुग्णाला तातडीने उपचारासाठी घेऊन जाताना सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून अडवणूक केली जात असल्याच्या तसेच रुग्णांच्या नातेवाईकांशी उद्धटपणे व अपशब्द वापरून बोलले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकारामुळे रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
रुग्ण गंभीर अवस्थेत असताना त्याला तातडीने डॉक्टरांपर्यंत पोहोचविणे अपेक्षित असते. मात्र, इमर्जन्सी विभागात रुग्णाला घेऊन जाताना सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून अडवणूक करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच नातेवाईकांना डॉक्टरांशी चर्चा करण्यापासून रोखले जात असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत.
या प्रकाराबाबत रफिक भाई शेख यांनी आवाज उठवत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सन्मानाने वागणूक मिळावी, अशी मागणी केली आहे. इमर्जन्सी विभागात कोणत्याही कारणामुळे उपचार प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ नये, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून खरोखरच अशा प्रकारची अडवणूक किंवा गैरवर्तन झाले आहे का, याची ससून रुग्णालय प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करणे गरजेचे आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेबरोबरच रुग्णालयातील शिस्त आणि सुरक्षा व्यवस्थेत योग्य समन्वय राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
इमर्जन्सी विभागात रुग्णाचा जीव आणि उपचार सर्वाधिक महत्त्वाचे असल्याने तक्रारींची तातडीने दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि दोष आढळल्यास संबंधितांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.







