Oplus_131072
काशिनाथ शिंदे : मुंबई
मुंबई : NEET परीक्षेतील कथित गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर देशभर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत २६ जुलै रोजी मुंबईत पक्षविरहित मोर्चा काढण्याची घोषणा त्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
ठाकरे म्हणाले की, सत्तेवर असलेल्या सरकारने झालेल्या चुकीची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. विरोधात असताना इतरांकडून मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आता स्वतःच्या मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सरकार आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “हा सत्तेचा उद्धटपणा आहे. आम्ही कोणाशीही बोलणार नाही, आंदोलनकर्त्यांशीही संवाद साधणार नाही, अशी भूमिका लोकशाहीला धरून नाही,” असे ठाकरे म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित नसून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेशी संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनीही या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
घोषणेनुसार, २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील पुतळ्यापासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा पूर्णपणे पक्षविरहित असून कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसतील, असेही स्पष्ट करण्यात आले
