Oplus_131072
काशिनाथ शिंदे : पुणे
पुण्यातील कात्रज परिसरात कोयता गँगने पुन्हा एकदा रक्तरंजित थैमान घालत १७ वर्षीय गणेश रवींद्र माळवे या अल्पवयीन तरुणाची निर्घृण हत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून तब्बल सात जणांनी कोयत्याने सपासप वार करून ही हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली.
प्राथमिक माहितीनुसार, सुमारे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी भररस्त्यात गणेशवर जीवघेणा हल्ला चढवला. कोयत्याने वार केल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या गणेशचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कात्रज परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत अवघ्या काही तासांत सातपैकी चार आरोपींना अटक केली. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच ताब्यात घेतले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची भर पावसात घटनास्थळी धिंड काढत गुन्ह्याची पुनर्रचना केली. या कारवाईने परिसरात मोठी चर्चा रंगली असून गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
मृताच्या नातेवाईकांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. या हत्येने पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगच्या वाढत्या दहशतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
