काशिनाथ शिंदे : निगडी
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथे १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. सात दिवस चालणाऱ्या या पर्वात साहित्य, संस्कृती, समाजप्रबोधन, व्याख्याने, परिसंवाद, पोवाडे, कवी संमेलन आणि गीतांच्या बहारदार कार्यक्रमांची पर्वणी नागरिकांना अनुभवता येणार आहे.
या पर्वाचा शुभारंभ शनिवारी (१ ऑगस्ट) सकाळी ९ वाजता महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीत अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून होणार आहे. पहिल्या दिवशी शिवाजी भिसे यांचा ‘ही छक्कड अण्णाभाऊं’, बापू पवार यांचा ‘लेखणीचा बादशहा’, चंदन कांबळे यांचा ‘स्वरचंदन’ तसेच ‘महाराष्ट्राची लोकसंस्कृती’ या विषयावरील कार्यक्रम सादर होणार आहेत.
रविवारी (२ ऑगस्ट) ‘आरक्षणाची समता, उपवर्गीकरणाची गरज आणि वास्तव’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून, प्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे पाटील हे ‘आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे – क्रांतीचा धगधगता इतिहास’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
सोमवारी (३ ऑगस्ट) ‘अण्णांची गौरवगाथा’, मातंग समाजाच्या प्राचीन इतिहासावर परिसंवाद आणि गायक चंद्रकांत शिंदे यांचा ‘गजर अण्णाचा’ हा विशेष कार्यक्रम होईल. मंगळवारी (४ ऑगस्ट) व्याख्याते वसंत हंकारे यांचे सामाजिक विषयावरील व्याख्यान, काजल शिंदे यांचे महिला जनजागृतीपर मार्गदर्शन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील.
बुधवारी (५ ऑगस्ट) महिला सक्षमीकरणावरील परिसंवाद आणि गायक साजन बेद्रे यांचा ‘अण्णा तुमच्यासाठी’ हा कार्यक्रम रंगणार आहे. गुरुवारी (६ ऑगस्ट) निमंत्रित कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून, शुक्रवारी (७ ऑगस्ट) प्रा. प्रदीप कदम यांचे लहुजी वस्ताद साळवे यांच्या जीवनकार्यावरील व्याख्यान, शाहीर युवराज ढगे व निवास चव्हाण यांच्या पोवाड्यांची मैफल आणि ‘महाराष्ट्राचा मराठी बाणा’ या भव्य गीतमय कार्यक्रमाने या प्रबोधन पर्वाची सांगता होणार आहे.
महापालिकेने नागरिकांना या सात दिवसीय विचार, संस्कृती आणि समाजप्रबोधनाच्या पर्वात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.







