काशिनाथ शिंदे : देहूरोड
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त संयुक्त अभिवादन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजप्रबोधन, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी दोन्ही महापुरुषांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा जागर केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्यास तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासक ॲड. कैलास पानसरे यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. उपस्थित मान्यवरांनीही पुष्प अर्पण करून दोन्ही महान विभूतींना अभिवादन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, समाजकारण आणि परिवर्तनवादी विचारांचा गौरव केला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी मराठी साहित्यविश्वात अजरामर स्थान निर्माण केले असून त्यांच्या साहित्याने उपेक्षित, वंचित आणि श्रमिक समाजाला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिन “वाचन-लेखन प्रेरणा दिन” म्हणून घोषित केल्याचा उल्लेख करत नव्या पिढीने त्यांच्या साहित्याचा अभ्यास करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
प्रशासक ॲड. कैलास पानसरे यांनी लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रसेवेचा गौरव करत स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाचा आढावा घेतला. ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली, तर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाज संघटन आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली, असे त्यांनी सांगितले.
कैलास वानखेडे यांनीही लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानावर प्रकाश टाकत युवकांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.
या कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक कोमल माने, पोलीस उपनिरीक्षक लखनकुमार वाव्हळे, अतुल मराठे, लहू मामा शेलार, हाजीमलंग मारीमुत्तू, प्रवीण झेंडे, महावीर बरलोटा, मदन सोनिगरा, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधीक्षक अजय चौधरी, मिकी कोचर, ह्यूमन राइट्सचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी, विलास शिंदे, सुनंदाताई आवळे, राजाराम अस्वरे, दीपक चौगुले, विजय मोरे, देहूरोड आरपीआयचे अध्यक्ष अरविंद गायकवाड, गणेश कोळी, विजय पवार, संदीप बालघरे, भक्ती कुरकुट, वैशाली आवघडे, शशी सप्पागुरू, सुरेश बागाव यांच्यासह कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष संजय (नाना) धुतडमल यांनी केले. सूत्रसंचालन सुनील गुरव यांनी तर आभार प्रदर्शन राजाराम अस्वरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोमल शिंदे, संजय साठे, कैलास वारके, प्रतीक धुतडमल, मनोज क्षिरसागर, संतोष खुडे, आर्यन खरात आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
संयुक्त अभिवादन सोहळ्यातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा आणि लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेचा वारसा जपण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला







