काशिनाथ शिंदे : पिंपरी
भोसरी येथील कौटुंबिक मिळकतीच्या विकास व्यवहारात आर्थिक फसवणूक, विश्वासघात आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप करत विशाल चोरडिया कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे संचालक कुणाल दिलीप चोरडिया यांच्याविरोधात तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी विनोद अनंता धुमाळ यांनी केली आहे. यासंदर्भात सोमवारी पिंपरी येथील नमस्कार हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.
धुमाळ यांनी सांगितले की, दि. २२ डिसेंबर २००६ रोजी वडील दिलीप मोतीलाल चोरडिया, मुलगा कुणाल दिलीप चोरडिया आणि मध्यस्थ प्रफुल्ल इनामदार यांच्या उपस्थितीत झालेल्या व्यवहारानुसार कुलमुखत्यारपत्र (दस्त क्र. १०३९७/२००६) आणि विकसन करारनामा (दस्त क्र. १०३९६/२००६) हवेली क्रमांक १७ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात कायदेशीररीत्या नोंदविण्यात आला होता. या करारानुसार विकासाच्या मोबदल्यात तळमजल्यावरील एक व्यावसायिक गाळा आणि ६५० चौरस फुटांचा सुपर बिल्ट-अप फ्लॅट चार वर्षांच्या आत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
या आश्वासनावर विश्वास ठेवून कुटुंबाने मिळकत विकासासाठी दिली. मात्र, जवळपास २० वर्षे उलटूनही विकासकाम सुरू झाले नसून करारातील कोणतीही अट पूर्ण करण्यात आलेली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासनेच मिळाल्याचा आरोप धुमाळ यांनी केला.
मोबदला किंवा मिळकत परत मिळावी, अशी मागणी केल्यानंतर कुणाल चोरडिया आणि प्रफुल्ल इनामदार यांनी धमकावण्यास सुरुवात केल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवीगाळ करून शर्टाची कॉलर पकडत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची, पोलिसांकडून कोणतीही कारवाई होणार नसल्याची आणि “मोठ्या लोकांशी संबंध आहेत” असे सांगत दबाव आणण्यात आल्याचा गंभीर आरोप धुमाळ यांनी पत्रकार परिषदेत केला.
या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असूनही अद्याप संबंधितांविरोधात अपेक्षित कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. सामान्य नागरिकाला न्यायासाठी वारंवार पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवावे लागत असतील, तर ही चिंताजनक बाब असल्याचे सांगत प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
“माझी कोणाशीही वैयक्तिक वैरभावना नाही. मात्र, माझ्या कुटुंबाची फसवणूक झाली असून आम्हाला न्याय मिळावा, एवढीच अपेक्षा आहे. व्यवहाराशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि तक्रारी पोलिसांकडे सादर करण्यात आल्या आहेत. न्याय न मिळाल्यास वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाकडे दाद मागण्याबरोबरच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल,” असा इशाराही विनोद धुमाळ यांनी यावेळी दिला.







