काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड
आगामी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी ताम्हिणी तसेच भोर-वरंधा घाटातील खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व कोकण खेड युवाशक्तीचे माजी अध्यक्ष रुपेश मोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, रस्ते खचले, पूल आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले असून, ताम्हिणी आणि भोर-वरंधा घाट मार्गांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.
यंदाचा गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होत असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील हजारो कुटुंबे आपल्या मूळ गावी कोकणात जाणार आहेत. ताम्हिणी आणि भोर-वरंधा हे कोकणात जाण्यासाठी महत्त्वाचे मार्ग असले तरी या मार्गांवर मोठे खड्डे, वाहून गेलेले रस्ते आणि सिमेंट रस्त्यांच्या बाजूचा भराव खचल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन ती उत्सवापूर्वी पूर्ण करावीत, अशी मागणी रुपेश मोरे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, अतिवृष्टीमुळे कोकणातील अनेक कुटुंबांचे नुकसान झाले असून, गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणारे नागरिक घरांची डागडुजी, शेतीची पाहणी आणि कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी प्रवास करणार आहेत. त्यामुळे भाविकांच्या श्रद्धेचा आणि सुरक्षिततेचा विचार करून प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात.
“गणरायाच्या आगमनासाठी गावाकडे निघालेल्या प्रत्येक गणेशभक्ताचा प्रवास सुरक्षित होणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. ताम्हिणी आणि भोर-वरंधा घाटातील रस्त्यांची दुरुस्ती गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करावी,” अशी अपेक्षा रुपेश मोरे यांनी व्यक्त केली आहे.







