काशिनाथ शिंदे :पुणे
गणेश पेठेतील डुल्या मारुती चौक परिसरात वडापावच्या गाडीवर पायाला पाय लागल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचा थरारक शेवट झाला. झालेल्या मारहाणीत छातीवर गंभीर मार लागल्याने शिवम राजेश परदेशी (वय २८) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी शिवम परदेशी आणि वैभव किशोर साळुंखे (वय २४) यांच्यात पायाला पाय लागल्याच्या कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी शिवमच्या छातीवर जोरदार मार लागल्याचे सांगण्यात येते.
मारहाणीनंतर शिवम घरी गेला आणि झोपी गेला. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो उठला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. छातीवर झालेल्या आघातामुळे अंतर्गत दुखापत झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी वैभव साळुंखे याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
महंमदवाडीतही हत्या; दगडाने मारहाण करून ४३ वर्षीय व्यक्तीचा जीव घेतला
दरम्यान, याच दिवशी पुण्यातील महंमदवाडी परिसरात आणखी एका हत्येची घटना घडली. लक्ष्मी पार्कजवळ सैफन बाबूलाल सय्यद (वय ४३) यांच्यावर दगडाने मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी हनुमंत कांबळे (वय २५) याला पोलिसांनी अटक केली असून, प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा संशय आहे.
पुण्यात एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमुळे किरकोळ वादातून वाढणाऱ्या हिंसाचाराचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद जीवघेणा ठरू शकतो, यामुळे नागरिकांनी वाद वाढविण्याऐवजी संयम बाळगून कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे गरजेचे आहे.







