खासदार श्रीरंग बारणे यांची मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी
काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड : फुगेवाडी–कुंदननगर परिसरातील हिंदू स्मशानभूमी आणि मुस्लिम दफनभूमीकडे जाणारा पूर्वीचा मार्ग रेल्वे प्रशासनाने पत्र्याचे कंपाऊंड उभारून बंद केल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे रेल्वेने उभारलेले पत्र्याचे कंपाऊंड तातडीने हटवून नागरिकांसाठी पूर्वीचा मार्ग खुला करावा, अशी ठाम मागणी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली.
फुगेवाडी–कुंदननगर परिसरात सुमारे १२ ते १४ हजार नागरिक वास्तव्यास आहेत. परिसरातील नागरिकांसाठी हिंदू स्मशानभूमी तसेच मुस्लिम समाजासाठी दफनभूमी उपलब्ध आहे. मात्र, रेल्वे विभागाने परिसराच्या दोन्ही बाजूंना पत्र्याचे कंपाऊंड उभारल्याने या दोन्ही ठिकाणी जाणारे पूर्वीचे मार्ग बंद झाले आहेत.
अंत्यविधीच्या वेळी मृतदेह घेऊन जाताना कुटुंबीय, नातेवाईक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अंत्यसंस्कारासाठी जाणारा मार्ग हा कोणत्याही धर्माच्या नागरिकांसाठी अत्यंत संवेदनशील आणि मूलभूत मानवी गरजेचा विषय आहे. त्यामुळे निर्माण झालेला अडथळा तातडीने दूर करणे आवश्यक असल्याचे खासदार बारणे यांनी स्पष्ट केले.
या गंभीर प्रश्नाबाबत खासदार बारणे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव, उपमहाव्यवस्थापक कृश किशोर मिश्रा, पुणे रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक प्रभात कुमार, प्रधान मुख्य अभियंता रजनीश मथुर तसेच मुख्य प्रशासकीय अधिकारी भुवनीय कुमार गुप्ता यांच्याकडे नागरिकांची समस्या मांडली.
रेल्वेने उभारलेले पत्र्याचे कंपाऊंड काढून पूर्वीचा मार्ग तातडीने खुला करावा. आवश्यक असल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कायमस्वरूपी प्रवेशमार्गाची व्यवस्था करावी. तसेच रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून नागरिकांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि विलंब न करता सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी बारणे यांनी केली.
यावेळी युवासेना शहर संघटक निलेश हाके, रेल्वे बोर्ड सदस्य सुदर्शन देसले तसेच फुगेवाडी–दापोडी परिसरातील शिवसैनिक उपस्थित होते.
अंत्यसंस्काराच्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी पुढाकार घेतल्याने रेल्वे प्रशासन या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करेल, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.







