कर्वेनगरमध्ये पालक बसमधून उतरले, मात्र नजरचुकीने मुलगा राहिला बसमध्ये; वनदेवी परिसरात कर्मचाऱ्यांना रडताना आढळला
काशिनाथ शिंदे
पुणे : पालकांसोबत बसमधून प्रवास करताना नजरचुकीने बसमध्येच राहिलेल्या १० वर्षीय तेजस पुंडलिक खराटे याला PMPMLच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परता, सतर्कता आणि माणुसकीमुळे सुखरूपपणे त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून, त्यांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
तेजस हा आपल्या आई-वडील आणि नातेवाईकांसोबत PMPMLच्या बसमधून प्रवास करत होता. संबंधित प्रवासी चिंचवडच्या बसमधून प्रवास करीत असताना त्यांचा पुढे जाण्याचा निर्णय बदलला. त्यामुळे कर्वेनगर येथे आई-वडील व नातेवाईक बसमधून उतरले. मात्र, प्रवाशांची गर्दी आणि घाईगडबडीत तेजस बसमध्येच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही.
काही वेळाने मुलगा सोबत नसल्याचे लक्षात येताच पालकांची धावपळ सुरू झाली. दरम्यान, वाहक गणेश रांगडे (वाहक क्र. २९९८), चालक तसेच तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तेजसचा शोध सुरू केला.
वनदेवी परिसरात रडताना आढळला
शोध घेत असताना वनदेवी परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्रजवळ तेजस कर्मचाऱ्यांना रडत असताना आढळून आला. कर्मचाऱ्यांनी त्याला धीर देत सुरक्षितपणे ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी त्याला कर्वेनगर पोलीस चौकीत नेण्यात आले.
कर्वेनगर पोलीस चौकीतील PSI नायकवाडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने आवश्यक कार्यवाही करण्यात आली. तेजसची ओळख पटवून त्याचे वडील पुंडलिक खराटे आणि आई सीमा पुंडलिक खराटे यांच्या ताब्यात त्याला सुखरूपपणे देण्यात आले.
कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक
या संपूर्ण घटनेत PMPMLच्या वाहक, चालक आणि तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांनी दाखविलेली तत्परता आणि माणुसकी विशेष कौतुकास्पद ठरली. मुलगा बसमध्ये राहिल्याचे लक्षात आल्यानंतर कोणताही विलंब न करता त्याचा शोध घेऊन त्याला सुरक्षितपणे पालकांपर्यंत पोहोचविण्यात आले.
या संवेदनशील आणि कौतुकास्पद कामगिरीबद्दल कोथरूड आगाराचे व्यवस्थापक सचिन वाबळे यांनी वाहक गणेश रांगडे आणि क्लार्क नितीन सुरेश पगारे यांचे विशेष कौतुक केले.
‘वाहतूक सेवा नव्हे, जनसेवेची बांधिलकी’
PMPMLची सेवा ही केवळ प्रवासी वाहतूक नसून जनसेवा, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकी जपण्याचे माध्यम असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. प्रवाशांच्या सुरक्षिततेसोबतच त्यांच्या अडचणीच्या प्रसंगी संवेदनशीलतेने मदतीला धावून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचे नागरिकांकडूनही कौतुक होत आहे.







