युवराज दाखले यांचे केंद्र व राज्य सरकारला निवेदन; मागणी मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा
काशिनाथ शिंदे
पुणे : सामाजिक न्याय आणि समाजकल्याण विभागाच्या जबाबदार पदावर असलेल्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि महाराष्ट्राचे समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या काही वक्तव्यांमुळे सामाजिक सलोखा आणि बंधुतेला बाधा निर्माण होत असल्याचा आरोप शिवशाही शासन पक्ष व अखिल भारतीय हिंदू मातंग संघाचे संस्थापक प्रमुख युवराज दाखले यांनी केला आहे. दोन्ही मंत्र्यांनी आपल्या पदाचा नैतिक अधिकार गमावला असून, त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी दाखले यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दाखले यांनी म्हटले आहे की, केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून रामदास आठवले, तर महाराष्ट्रात समाजकल्याण मंत्री म्हणून संजय शिरसाट हे महत्त्वाच्या जबाबदारीच्या पदावर आहेत. या पदांवर असलेल्या व्यक्तींची भूमिका समाजातील सर्व घटकांमध्ये सामाजिक सलोखा, समता आणि बंधुता निर्माण करण्याची असणे अपेक्षित आहे.
मात्र, गेल्या काही काळातील दोन्ही मंत्र्यांची वक्तव्ये आणि भूमिका सामाजिक सलोखा निर्माण करणारी नसून समाजात दरी निर्माण करणारी असल्याचा आरोप दाखले यांनी केला आहे. वंचित, मातंग समाजासह सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्यात दोन्ही मंत्री अपयशी ठरल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
‘नैतिक अधिकार गमावला’
“सामाजिक न्याय आणि समाजकल्याणाची जबाबदारी असलेल्या मंत्र्यांकडून समाजातील सर्व घटकांना न्याय, समानता आणि बंधुतेचा संदेश जाणे अपेक्षित आहे. मात्र, त्यांच्या भूमिकेमुळे सामाजिक सलोख्याऐवजी दरी निर्माण होत असेल, तर त्यांनी पदावर राहणे योग्य नाही,” असा दावा युवराज दाखले यांनी केला.
त्यामुळे केंद्र सरकारने रामदास आठवले यांचा, तर महाराष्ट्र शासनाने संजय शिरसाट यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
मागणी मान्य न झाल्यास आंदोलन
दरम्यान, शासनाने या मागणीची दखल घेतली नाही, तर शिवशाही शासन पक्ष आणि अखिल भारतीय हिंदू मातंग संघाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही युवराज दाखले यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात या मागणीवरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.







