रूपीनगर-तळवडे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न; कचरा संकलनाचे निश्चित वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी
काशिनाथ शिंदे
पिंपरी, रूपीनगर-तळवडे परिसरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये कचरा व्यवस्थापनाचा उडालेला बोजवारा आणि वाढत्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न सौ. शिवानीताई दादासाहेब नरळे यांनी महापालिकेच्या सभागृहात उपस्थित केला. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी महापौर व महापालिका आयुक्तांकडे केली.
प्रभागातील अनेक भागांत नियमितपणे कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कचरा संकलन करणाऱ्या वाहनांचे निश्चित वेळापत्रक आणि मार्ग निश्चित करून ते नागरिकांसाठी जाहीर करावेत, अशी मागणी शिवानी नरळे यांनी केली.
तसेच, रूपीनगरजवळील मोकळ्या जागेत देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कचरा टाकला जात असल्याचा आणि हा कचरा जाळला जात असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धूर व प्रदूषण निर्माण होत असल्याचा मुद्दाही त्यांनी सभागृहात मांडला. कचरा जाळण्याच्या प्रकारावर तातडीने कारवाई करून नागरिकांना धुराच्या त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली.
ज्या ठिकाणी कचरा साचला आहे, तो तात्काळ हटवावा. भविष्यात त्या ठिकाणी पुन्हा कचरा टाकला जाणार नाही किंवा जाळला जाणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. यासाठी महापालिका प्रशासन आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने समन्वय साधून ठोस कार्यवाही करावी, अशी ठाम भूमिका शिवानी नरळे यांनी मांडली.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी सौ. शिवानीताई दादासाहेब नरळे यांनी केली आहे.







