आमदार शंकर जगताप यांचा थेट जनसंवाद; वाहतूककोंडी, अतिक्रमणांसह मूलभूत प्रश्नांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश
काशिनाथ शिंदे
पिंपरी, नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमाला रावेत, किवळे आणि मामुर्डी परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रावेत येथील समीर लॉन्समध्ये झालेल्या या जनसंवाद कार्यक्रमात तब्बल ७१५ नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेत, संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, वीज, वाहतूक, अतिक्रमण, कचरा व्यवस्थापन, रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. तत्काळ सोडविता येणाऱ्या प्रश्नांवर जागेवरच कार्यवाही करण्याचे निर्देश देतानाच तांत्रिक अथवा प्रशासकीय प्रक्रियेची आवश्यकता असलेल्या प्रश्नांचा कालबद्ध पद्धतीने पाठपुरावा करण्याचे आदेश आमदार जगताप यांनी अधिकाऱ्यांना दिले.
अतिक्रमणमुक्त रावेतचा निर्धार
रावेत परिसरातील वाढत्या अतिक्रमणांच्या प्रश्नावर आमदार जगताप यांनी आक्रमक भूमिका घेतली. पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या फुटपाथवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारे खाजगी तसेच महापालिकेच्या जागेवरील आठवडे बाजार हटविण्यासाठी कडक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
रस्त्यांच्या दुतर्फा उभी केली जाणारी जड वाहने, कचरा संकलन केंद्र, अनियमित घंटागाडी आणि वाहतूककोंडीच्या प्रश्नांकडेही नागरिकांनी लक्ष वेधले. या समस्यांवर संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या.
किवळे-मामुर्डीच्या मूलभूत प्रश्नांवरही चर्चा
किवळे परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र उद्यान विकसित करावे, सेवा रस्त्यांचे डांबरीकरण करावे, स्ट्रीट लाईट सुरू कराव्यात, डीपीमधील रस्ते विकसित करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव, पाणीपुरवठा, वीजपुरवठा आणि महावितरणशी संबंधित प्रलंबित प्रश्नही यावेळी मांडण्यात आले.
विकासनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने विरंगुळा व सांस्कृतिक केंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली. या मागण्यांबाबतही संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार जगताप यांनी दिल्या.
एकाच छताखाली विविध विभाग; नागरिकांना थेट अधिकाऱ्यांशी संवाद
‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमामुळे नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या न मारता एकाच ठिकाणी आपल्या समस्या मांडता आल्या. कार्यक्रमस्थळी आरोग्य, पाणीपुरवठा, स्थापत्य, उद्यान, कर संकलन, नगररचना, बांधकाम परवानगी, विद्युत आणि पर्यावरण विभागांची दालने उभारण्यात आली होती.
तसेच तहसील विभाग, रेशनकार्ड, तलाठी, एमएनजीएल, एमएसईबी आणि एनएचएआय विभागांचे अधिकारीही नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी उपस्थित होते. प्रत्येक तक्रारीची नोंद घेऊन संबंधित विभागाकडे तिची जबाबदारी निश्चित करण्यावर भर देण्यात आला.
यावेळी स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे, तहसीलदार जयराज देशमुख, उपायुक्त राजेश आगळे, प्रदीप ठेंगल, नायब तहसीलदार रवींद्र कुलकर्णी, अन्नधान्य वितरण अधिकारी डॉ. विजयकुमार क्षीरसागर, ‘ज’ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, मनपा कार्यकारी अभियंता सुनील पवार, कार्यकारी अभियंता सुनील शिंदे, संध्या वाघ, महावितरणचे सहाय्यक अभियंता रत्नदीप काळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन महाजन, सहाय्यक निवडणूक अधिकारी वैशाली शिंदे, रावेत पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप देशमुख, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन लिंभोरे, राहुल सोनवणे, अमोल कोरडे यांच्यासह शहर भाजप पदाधिकारी दीपक भोंडवे, रावेत-वाल्हेकरवाडी मंडलाध्यक्ष मोहन राऊत, श्रीकांत भोंडवे, माजी नगरसेवक बाळासाहेब तरस, सोमनाथ भोंडवे आदी उपस्थित होते.
‘नागरिकांचा प्रत्येक प्रश्न माझ्यासाठी प्राधान्याचा’
“नागरिकांनी आपल्या प्रश्नांसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवू नयेत, यासाठी थेट नागरिकांपर्यंत जाण्याचा माझा हा प्रयत्न आहे. ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून रावेत, किवळे आणि मामुर्डीकरांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. स्थानिक पातळीवरील प्रश्नांसोबतच शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या विषयांवरही संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून ठोस आणि कालबद्ध कार्यवाही केली जाईल. नागरिकांचा प्रत्येक प्रश्न हा माझ्यासाठी प्राधान्याचा विषय असून, त्याचा निरंतर पाठपुरावा केला जाईल,” असे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.







