अंत्यसंस्कारासाठी नागरिकांची फरफट थांबवा; रावेत-वाल्हेकरवाडीतील रखडलेल्या प्रश्नावर सर्वसाधारण सभेत आक्रमक भूमिका
काशिनाथ शिंदे
पिंपरी, रावेत-वाल्हेकरवाडी परिसरातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी होणारी फरफट थांबविण्यासाठी प्रस्तावित स्मशानभूमीचे काम तातडीने सुरू करावे, अशी आक्रमक मागणी नगरसेविका पल्लवी सुधीर वाल्हेकर यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. राष्ट्रीय हरित लवाद आणि ‘नीरी’कडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत असतानाही प्रत्यक्ष काम रखडल्याबद्दल त्यांनी प्रशासनाला जाब विचारला.
“मंजुरी मिळूनही नागरिकांना आणखी किती दिवस मूलभूत सुविधेपासून वंचित ठेवणार?” असा थेट सवाल करत वाल्हेकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
रावेत आणि वाल्हेकरवाडी परिसराच्या मध्यवर्ती भागात प्रस्तावित असलेल्या स्मशानभूमीचा प्रश्न गेल्या काही काळापासून प्रलंबित आहे. काही नागरिकांच्या विरोधामुळे हा प्रकल्प रखडल्याचे सांगितले जात होते. मात्र, १५ जुलै रोजी राष्ट्रीय हरित लवादाने या प्रकल्पाला मंजुरी दिल्याचे वाल्हेकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
प्रस्तावित जागा पूररेषेबाहेर असून, जवळील निवासी सोसायट्या आणि स्मशानभूमी यांच्यातील अंतर नियमानुसार ७० मीटरपेक्षा अधिक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘नीरी’च्या अहवालानुसार या ठिकाणी अत्याधुनिक विद्युत दाहिनी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पारंपरिक अंत्यसंस्काराच्या तुलनेत प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला.
“पर्यावरणाच्या दृष्टीनेही प्रकल्पाला अनुकूल अहवाल मिळाला आहे. आवश्यक मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली असेल, तर प्रत्यक्ष काम सुरू करण्यास विलंब का?” असा सवाल वाल्हेकर यांनी प्रशासनाला केला.
आरक्षित जागेवर कचऱ्याचे ढीग; अनधिकृत पार्किंगचा विळखा
स्मशानभूमीचे काम रखडल्यामुळे आरक्षित जागेची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचा मुद्दाही वाल्हेकर यांनी उपस्थित केला. या जागेवर कचरा टाकला जात असून अनधिकृतपणे वाहनांचे पार्किंग केले जात आहे. सार्वजनिक वापरासाठी आरक्षित असलेल्या जागेचा गैरवापर होत असल्याने भविष्यात येथे विविध गैरप्रकारांना वाव मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
आरक्षित जागेवरील कचरा आणि अनधिकृत पार्किंग तातडीने हटवून जागा स्वच्छ करावी आणि स्मशानभूमीच्या प्रत्यक्ष कामाला विलंब न करता सुरुवात करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दुःखाच्या प्रसंगीही अंत्यसंस्कारासाठी वणवण
रावेत, वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा परिसर, चिंचवडे नगर आणि बिजलीनगर भागात कामगार तसेच सर्वसामान्य कुटुंबांची मोठी लोकसंख्या आहे. मात्र, परिसरात पुरेशी स्मशानभूमी सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी दूरच्या ठिकाणी जावे लागत आहे.
कुटुंबातील व्यक्तीच्या निधनाचे दुःख असतानाच अंत्यसंस्कारासाठी जागा शोधण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे वाल्हेकर यांनी सभागृहात नमूद केले. काही महिन्यांपूर्वी एका गरीब कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी जागा कुठे मिळणार, असा गंभीर प्रश्न कुटुंबीयांसमोर निर्माण झाल्याचे उदाहरणही त्यांनी दिले.
“नागरिकांच्या दुःखाच्या प्रसंगीही त्यांना मूलभूत सुविधेसाठी संघर्ष करावा लागत असेल, तर प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आता तरी विलंब न करता स्मशानभूमीचे काम सुरू करावे,” अशी ठाम भूमिका वाल्हेकर यांनी मांडली.
प्रभाग १७ मधील कचऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर
दरम्यान, प्रभाग क्रमांक १७ मधील रस्त्यांच्या कडेला आणि मोकळ्या जागांमध्ये अनधिकृतपणे कचरा टाकण्याच्या प्रकाराकडेही पल्लवी वाल्हेकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. नियमित कचरा संकलन व्यवस्था असतानाही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी, अस्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच कचरा टाकला जाणाऱ्या ठिकाणी नियमित स्वच्छता, देखरेख आणि आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
रावेत-वाल्हेकरवाडी परिसराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेता स्मशानभूमीचा रखडलेला प्रश्न तातडीने मार्गी लावणे आवश्यक आहे. मंजुरी आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही काम रखडत असल्याने प्रशासनाने आता ठोस निर्णय घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी मागणी पल्लवी वाल्हेकर यांनी लावून धरली आहे.







