मराठवाडा प्रतिष्ठानतर्फे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार
काशिनाथ शिंदे
पिंपरी, देशातील सध्याची परिस्थिती पाहता तरुणांच्या समस्यांकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी, प्रवेशातील अडचणी, नीटसारख्या परीक्षांमधील घोळ, त्यानंतर बेरोजगारी आणि वाढता भ्रष्टाचार यामुळे तरुणांमध्ये नैराश्य वाढत आहे. परिणामी काही तरुण व्यसनाच्या आहारी जात आहेत, तर काही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. या परिस्थितीतून तरुणांना बाहेर काढण्यासाठी शिक्षणासोबत संस्कारांची नितांत गरज असून, संस्कारक्षम पिढी घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम शिक्षकच करू शकतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांनी केले.
मराठवाडा प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त देवगिरी इंग्लिश मीडियम स्कूल आणि मातोश्री प्राथमिक विद्यामंदिर, चिखली येथील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांच्या हस्ते शिक्षकांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक कुमार जाधव, उपाध्यक्ष उत्तम दंडीमे, लक्ष्मण लिंबापुरे, संचालिका स्मिता जाधव, प्रीती शिंदे, पूजा जाधव, प्राचार्य शहिदा सय्यद आदी उपस्थित होते.
सातुर्डेकर म्हणाले, भारतीय संस्कृतीमध्ये कृतज्ञतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव’ असे आपल्या संस्कृतीत सांगितले जाते. स्वामी विवेकानंदांनी जीवनाची परिपक्वता म्हणजे शिक्षण असे म्हटले आहे. ही परिपक्वता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी जे अथक परिश्रम घेतात, तेच खऱ्या अर्थाने गुरु असतात.
पूर्वी ऋषी-मुनींच्या काळात गुरुकुल पद्धतीतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात होता. मात्र काळानुरूप परिस्थिती बदलली आहे. विद्यार्थी संख्या वाढल्याने अनेकदा शिक्षकांनाही सर्व विद्यार्थ्यांची नावे लक्षात ठेवणे कठीण होते. त्यातच अनेक कुटुंबांमध्ये आई-वडील दोघेही नोकरी करीत असल्याने मुलांकडे पुरेसे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी शिक्षकांकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जाते, असे त्यांनी सांगितले.
शिक्षक हा आजही समाजातील सर्वाधिक प्रामाणिक घटक म्हणून ओळखला जातो. साक्षरतेचा प्रसार, कुटुंब नियोजनाची जनजागृती, मतदार याद्यांचे काम अशा विविध शासकीय उपक्रमांसाठी शासनाला शिक्षकांचीच आठवण होते. मात्र, शिक्षणाव्यतिरिक्त विविध कामांचा बोजा शिक्षकांवर टाकला जात असल्याने त्यांच्या अध्यापनाच्या मुख्य कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. शिक्षकांना शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या संस्कारक्षम घडणीसाठी अधिक वेळ मिळणे आवश्यक आहे, असेही सातुर्डेकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष कुमार जाधव, उपाध्यक्ष उत्तम दंडीमे, संचालिका प्रीती शिंदे, प्राचार्य शहिदा सय्यद, तसेच कीर्ती दुरुगकर, मालन गाडीलकर, वर्षाली चेंगे, सबीना सय्यद, आरती खोडसुरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल तुपे व तेजना गिरमे यांनी केले.







