काशिनाथ शिंदे पिंपरी
पुणे माणसाचा सन्मान त्याच्या जन्मजात किंवा जातीवरून ठरविला जाऊ नये, प्रत्येकाला वेद वाचण्याचा आणि समजून घेण्याचा अधिकार मिळावा, यासाठी महर्षी दयानंद सरस्वती यांनी सामाजिक समतेचा संदेश दिला. महात्मा जोतीराव फुले तसेच मागासवर्गीय नागरिकांच्या मागणीनुसार १८७५ मध्ये पुण्यातील मोमीनपुरा येथे त्यांनी व्याख्यान दिले. पुणे प्रवासादरम्यान दिलेल्या एकूण ३५ व्याख्यानांतून त्यांनी मानवकल्याणाचा मार्ग समाजासमोर मांडला, असे प्रतिपादन वेदपालजी आर्य यांनी केले.
महर्षी दयानंद सरस्वती पुणे प्रवास प्रवचने १५१ वा स्मृती समारंभ महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा तसेच पिंपरी, नाना पेठ, वारजे, खडकी, आळंदी आणि चिंचवड आर्य समाज यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी आर्य समाज भवन येथे रविवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी वेदपालजी आर्य बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी आर्य समाजाचे प्रधान सुरेंद्र करमचंदानी होते. यावेळी सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा दिल्लीचे महामंत्री ॲड. प्रकाश आर्य, आर्य प्रतिनिधी सभा दिल्लीचे महामंत्री विनय आर्य, राजस्थानचे वैदिक विद्वान आचार्य कर्मवीर मेधार्थी, नर्मदापुरम मध्य प्रदेश येथील ऋतूस्पती आर्य, प्रमोद तिवारी, प्रमोद मिश्रा, बाळकृष्ण भिडे यांचे वंशज छाया बर्वे भिडे, ॲड. गंगाराम भाऊ म्हस्के यांचे वंशज राजेंद्र म्हस्के, समन्वयक प्रा. साईनाथ पुण्णे आदी उपस्थित होते.
यावेळी महर्षी दयानंद सरस्वती यांनी पुण्यात दिलेल्या प्रवचनांपैकी १५ व्याख्यानांचा समावेश असलेल्या ‘प्रबोधन काळातील पुणे प्रवचन’ या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच छाया बर्वे भिडे, राजेंद्र म्हस्के आणि प्रा. साईनाथ पुण्णे यांचा गौरव करण्यात आला.
आचार्य कर्मवीर मेधार्थी म्हणाले की, सुमारे १५१ वर्षांपूर्वी पुण्यात महर्षी दयानंद सरस्वती यांच्या व्याख्यानांना आणि मिरवणुकीला विरोध करण्यात आला होता. आज त्याच पुण्यातील ऐतिहासिक म्हस्के वाडा ते भिडे वाडा या मार्गावर निघालेल्या मिरवणुकीवर पुणेकरांनी पुष्पवृष्टी केली. या विचारपरिवर्तनासाठी १५१ वर्षांचा कालावधी जावा लागला, ही परिवर्तनाची मोठी साक्ष आहे.
ऋतूस्पती आर्य म्हणाले की, आजच्या दिशाहीन आणि संभ्रमित तरुण पिढीला महर्षी दयानंद सरस्वती यांचे विचार मार्गदर्शक ठरू शकतात. महर्षींनी सतीप्रथेला विरोध करून महिलांच्या सन्मानासाठी भूमिका घेतली. वेदाध्ययनातील भेदभाव नाकारून सर्वांसाठी गुरुकुलाची संकल्पना मांडली आणि महिलांनाही वेदाध्ययनाचा अधिकार मिळवून दिला.
विनय आर्य म्हणाले की, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, महात्मा जोतीराव फुले, उद्योगपती नाना जगन्नाथ शंकरशेठ तसेच पुण्यातील शेकडो विद्वानांच्या उपस्थितीत आणि मोमीनपुरा येथील मागासवर्गीय वस्तीत वेदांवर व्याख्यान देण्याचे धाडस महर्षी दयानंद सरस्वती यांनी केले. युवा पिढीने भारताचा हा गौरवशाली इतिहास अभ्यासून महर्षी दयानंद यांच्या विचारांचा प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
ॲड. प्रकाश आर्य यांनी समाजातील जातिभेद नष्ट करणे हा महर्षी दयानंद सरस्वती यांच्या कार्याचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले. मनोरंजन आणि भौतिक सुखांच्या मागे भरकटत जाणाऱ्या युवा पिढीला योग्य दिशा देण्याचे कार्य आर्य समाजाच्या प्रतिनिधींनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
दिल्ली आर्य समाज सभेचे प्रधान सुरेंद्रकुमार आर्य यांच्या शुभसंदेशाचे वाचन दीप्ती विद्यार्थी यांनी केले.
मुख्य समारंभापूर्वी सकाळी प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. गंगारामभाऊ म्हस्के यांच्या पुणे कॅम्प येथील वाड्यापासून बुधवार पेठेतील तांबडी जोगेश्वरी परिसरातील भिडे वाड्यापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
समारंभाच्या आयोजनासाठी उत्तम दंडीमे, दिनेश यादव, दिगंबर रिद्धीवाडे, संजीव भाट, ज्ञानेश्वर राणे, वैशाली यादव आदींनी सहभाग घेतला. स्वागत पिंपरी आर्य समाजाचे प्रधान सुरेंद्र करमचंदानी यांनी केले. सूत्रसंचालन नलिनी देशपांडे आणि दीप्ती विद्यार्थी यांनी केले, तर आभार प्रा. साईनाथ पुण्णे यांनी मानले.







