Oplus_131072
काशिनाथ शिंदे : देहूरोड
राजकारणात सत्तेच्या समीकरणानुसार पक्ष बदलणाऱ्यांची संख्या मोठी असते. मात्र विचारांशी तडजोड न करता, तब्बल ४६ वर्षे एकाच पक्षाशी अखंड निष्ठा जपणारे देहूरोडचे ज्येष्ठ शिवसैनिक रमेशभाऊ पिराजी जाधव हे आजही भगव्या विचारांचे ठाम प्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाला उजाळा देत अनेकांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला.
१९८० साली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन रमेशभाऊ जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दिवंगत संभाजी आवळे आणि दिवंगत मिलिंद रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची राजकीय जडणघडण झाली. आंदोलन, संघटन, जनसंपर्क आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणे, हेच शिवसैनिकाचे कर्तव्य असल्याचे संस्कार त्यांनी आपल्या गुरूंकडून घेतले.
१९९२ मध्ये त्यांनी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक लढविली. विजय मिळाला नसला तरी जनतेशी असलेली त्यांची नाळ अधिक दृढ झाली. त्यानंतर २००८ मध्ये त्यांच्या पत्नीनेही कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक लढविली. निवडणुकीतील अपयशाने न डगमगता समाजसेवा आणि संघटनकार्याचा ध्यास त्यांनी कायम ठेवला.
१९९५ मध्ये संभाजी आवळे यांच्या हत्येनंतर आणि २००२ मध्ये मिलिंद रोकडे यांच्या निधनानंतर देहूरोडमधील शिवसेनेसमोर नेतृत्वाचे मोठे आव्हान निर्माण झाले. अशा कठीण काळात रमेशभाऊ जाधव यांच्यावर शहरप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. तब्बल १२ वर्षे त्यांनी ही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत संघटना अधिक सक्षम केली. देहूरोडच्या शिवसेनेच्या इतिहासात सर्वाधिक काळ शहरप्रमुख राहण्याचा मान त्यांच्या नावावर आहे.
देहूरोड परिसरातील पाणी, रस्ते, वीज, मूलभूत सुविधा, कामगारांचे प्रश्न तसेच मावळ तालुका आणि पुणे जिल्ह्यातील विविध जनआंदोलनांमध्ये त्यांनी नेहमीच सक्रिय भूमिका बजावली. प्रसिद्धीपेक्षा जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांनी कार्यकर्त्यांसह अनेक लोकहिताचे लढे उभारले.
शिवसेनेत काळानुसार अनेक राजकीय घडामोडी, फूट आणि पक्षांतराची वादळे आली. अनेकांनी सत्तेसाठी आणि पदांसाठी पक्ष बदलला. मात्र रमेशभाऊ जाधव यांनी विचारांशी आणि भगव्या ध्वजाशी कधीही बेईमानी केली नाही. आजही पक्षातील महत्त्वाच्या संघटनात्मक निर्णयांमध्ये त्यांच्या मताला मान दिला जातो.
मितभाषी, संयमी, स्वाभिमानी आणि प्रसंगी आक्रमक अशी ओळख असलेले रमेशभाऊ जाधव यांनी कधीही पदाचा मोह न ठेवता प्रत्येक जबाबदारी ही सेवाच मानली. त्यामुळेच कार्यकर्त्यांच्या मनात त्यांनी कमावलेले स्थान हे कोणत्याही पदापेक्षा मोठे मानले जाते.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजकारण व शिवसेनेच्या कार्यासाठी त्यांना अखंड ऊर्जा लाभो, अशा भावना व्यक्त करण्यात येत आहेत
